पंजाबमधील घुमानमध्ये होत असलेल्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे मंगळवारी पुण्यात उदघाटन झाले. तसेच संमेलनाच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी तीन ते पाच एप्रिलदरम्यान हे संमेलन होत आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन होत आहे.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात संमेलन होणार होते. परंतु पंजाबमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रचंड थंडी असते. त्यामुळे संमेलनाच्या तारखा पुढे ढकलण्याचा विचार सुरू झाला. थंडी आणि मुलांच्या परीक्षा या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून संमेलन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे निमंत्रक भारत देसडला आणि संयोजक संजय नहार यावेळी उपस्थित होते.