इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
	मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
	 
	ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
	मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !
	 
	गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
	पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?
	 
	मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-
	मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !