बाप तो बापच आसतो

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (11:43 IST)
"पंखे, लाईट बंद न करता बाहेर का निघून जाता?"
 
"टीव्ही चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही. तो पाहिला बंद करा" "पेन स्टँड वर ठेवा, नाहीतर खाली पडेल"
 
मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना अजिबात आवडत नसतात. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे.
 
प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्या फार फरकाने हीच गोष्ट असते.
 
काल जोपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं.
 
पण आज त्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं.
"मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार". वडिलांची बोलणी असह्य झालीत. असं त्याला वाटत होतं.
 
तो मुलाखतीसाठी निघाला.
 
"कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे, आणि उत्तर आलं जरी नाही तरी ठोकून दे" असं सांगून वडिलांनी
 
त्याला लागणार होते त्यापेक्षा जास्त पैसे दिले.
मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचला.
 
तिथे प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचं ल्याच व्यवस्थित बसवलं नव्हतं. त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता. त्याने ते दरवाजा आपटायचा बंद केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला.
 
आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता. पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता.
 
याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं. 
"पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं.
 
तो हळूच जिना चढू लागला.
 
काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते.
 
त्याला वडिलांचे शब्द आठवले "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?"
 
आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला. त्या विचारातच त्याने दिवे बंद केले.
 
वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला.
 
त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आले की ती चटई     दुमडली होती. कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती. त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. 
 
त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते, तर मागील काही ओळी रिक्त होत्या, परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते.
 
त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या.
 
अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसर्ऱ्या दरवाजातून बाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. 
 
तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला.
 
मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, "तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" 
 
त्यांला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे, किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला. 
"आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले. "आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याहीच्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत.  आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली.  
 
"आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी, स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत.
 
आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले. 
 
आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे. या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला.
 
त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला.
 
आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे!
 
दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात. 
 
आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात.
 
आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते  आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं.  ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती