एअर इंडियामध्ये नोकरीची संधी

सोमवार, 10 एप्रिल 2023 (14:22 IST)
टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान पुन्हा आल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी करण्यावर टाटा समूहाकडून भर दिला जात आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर बुक केल्यानंतर आता एअर इंडियामध्ये हजारो पदांसाठी पुन्हा मोठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 6 महिन्यात सुमारे 3 हजार 800 जणांना नोकरी दिल्यानंतर आता पुन्हा एअर इंडियाकडून विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात इंजिनिअर्सना संधी असल्याचे म्हटले जात आहे.
 
पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला 6 हजार 500 पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून, लवकरच एअर इंडियामध्ये पुन्हा भरती सुरू होणार आहे.  
 
एअर इंडियाने (AI) गेल्या सहा महिन्यांत क्रू आणि इतर कामांमध्ये 3,800 हून अधिक कर्मचारी जोडले आहेत. तसेच, एअरलाइनने आपल्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांसाठी 29 नवीन धोरणे आणली आहेत.
 
विमान कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. एअर इंडिया आता माहिती तंत्रज्ञान (IT) सिस्टीममध्ये $200 दशलक्ष गुंतवणूक करत आहे आणि सध्याच्या विमानांना पूर्णपणे अपग्रेड करण्यासाठी $400 दशलक्ष गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहे.
 
कंपनीने 470 विमानांच्या खरेदीची ऑर्डरही दिली आहे. टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोट्यात चाललेल्या विमान कंपनीचे नियंत्रण मिळवले होते. त्याने आता एअर इंडियाची पुनरुज्जीवन योजना 'Vihaan.ai' लागू केली आहे.
 
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले की परिवर्तनाच्या प्रवासाच्या पहिल्या सहा महिन्यांत अनेक समस्यांचे निराकरण करण्यात लक्षणीय प्रगती दिसून आली आहे आणि एअरलाइनने तिच्या वाढीचा पाया प्रस्थापित करण्यासाठी बराच पल्ला गाठला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती