सोलोगॅमी म्हणजे काय? फायदे आणि तोटे काय ?

शनिवार, 11 जून 2022 (16:38 IST)
सोलोगॅमी म्हणजे काय?
तरुणांमध्ये सोलोगामीचा सराव झपाट्याने वाढत आहे. लोक आता स्वतःशीही लग्न करू लागले आहेत. याला सेल्फ मॅरेज, सोलोगॅमी किंवा ऑटोगॅमी ही म्हणतात. दोन लोक एकमेकांवर जसं प्रेम करतात 
तसं तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर लग्नासाठी दोन व्यक्तींची गरज नाही. तुम्ही स्वतःशी लग्न करू शकता. ज्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचे आहे आणि कोणाचीही जोडीदाराची गरज नाही, 
अशा व्यक्ती लग्नाकडे वळतात.
 
ज्याप्रमाणे बहुपत्नीत्वाला पॉलीगॅमी म्हणतात, एकपत्नीत्वाला मोनोगॅमी म्हणतात, त्याचप्रमाणे एकल विवाहाला सोलोगॅमी म्हणतात. स्वतःशी लग्न करण्याचा हा एक मार्ग आहे.
 
सोलोगॅमी ही स्वतःवर प्रेम करण्याची वेगळी संकल्पना आहे. काही लोक स्वतः वर इतकं प्रेम करतात ते स्वतःशीच लग्न करतात. बहुतेक मुली या संकल्पनेकडे वळत आहेत. सोलोगॅमीला कायदेशीर 
मान्यता मिळाली नसावी, परंतु सोलोगॅमी करणारे बहुतेक लोक सामाजिक मेळावे आयोजित करतात आणि नंतर लग्न करतात.
 
भारतीय समाज याला प्रतीकात्मक विवाह मानू शकतो. 'स्व-प्रेम' या संकल्पनेला दिशा देणारे हे काम आहे. काही लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी तडजोड करत नाहीत. त्यांना कोणत्याही सामाजिक बंधनात 
जखडण्याची गरज नाही. अशा स्थितीत लोक हा मार्ग स्वीकारतात.
 
एसेक्सुअल लोक देखील सोलोगॅमीला अधिक प्राधान्य देतात. सोलोगॅमीचा ट्रेंड आता विकसित देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे. ही एक अतिशय वेगळी संज्ञा आहे, जी लोक जाणून घेण्याचा आणि समजून 
घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याला सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न केला तर वधू हीच वर आहे आणि वर म्हणजे वधू असे समजू शकते. वधू आणि वर स्वतः एकच व्यक्ती आहे जी स्वत:शी विवाह 
करतात.
 
सोलोगॅमी पद्धत कधी सुरू झाली?
सोलोगॅमीची सुरुवात 90 च्या दशकात झाली. लिंडा बेकर नावाच्या महिलेने 1993 मध्ये स्वतःशी लग्न केले. लिंडा बेकरच्या लग्नाला प्रथम स्व-विवाहाचा दर्जा मिळाला आहे. जेव्हा लिंडा बेकरचे लग्न झाले तेव्हा सुमारे 75 लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. 1993 नंतर असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा लोकांनी असे विवाह केले आहेत.
 
लोक स्वतःहून घटस्फोट घेतात!
आता सेल्फ मॅरेज असेल तर सेल्फ डिव्होर्स ही संकल्पनाही येणार हे नक्की. जिथे लग्न आहे तिथे घटस्फोटाचीही शक्यता असते. ब्राझिलियन मॉडेल ख्रिस गॅलेराने स्वतःला घटस्फोट दिला होता. कारण 
90 दिवसांनंतर ती प्रेमात पडली होती.
 
सेल्फ मॅरिज कसं केलं जातं?
स्वतःवर प्रेम करण्यासाठी कोणताही नियम किंवा कायदा असू शकत नाही त्याच प्रकारे स्वविवाहाच्या बाबतीतही असेच आहे. विवाहात ज्या परंपरा पाळल्या जातात, त्याच परंपरा स्व-विवाहातही पाळल्या 
जातात. पण स्व-विवाह करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी अनेक कंपन्याही पुढे आल्या आहेत. ते एखाद्या मेगा इव्हेंटसारखे डिझाइन करतात.
 
स्व-विवाहाचे फायदे आणि तोटे काय
स्वविवाहाची संकल्पना बघायला आणि ऐकायला चांगली आहे. असे दिसते की लोक स्वतःबद्दल विचार करतात, स्वतःवर प्रेम करतात. अशा स्त्रिया ज्या स्वावलंबी, यशस्वी, असतात त्या स्व-विवाहाला प्राधान्य देत आहे. ते कोणत्याही बंधनात अडकू इच्छित नाहीत. जोडीदाराच्या अपेक्षा, कर्त्वय यात अडकायचं नसतं. त्यांना मोकळा श्वास घ्यायचा असतो.
 
काही लोकांचा असा विश्वास आहे की कधीकधी एकाकीपणा हा शाप असतो. भव्य सामाजिक मेळाव्यात स्वविवाहाचे आयोजन केले जाऊ शकते परंतु लोक एक ना एक दिवस एकटेपणाचा कंटाळा करतात. स्वविवाहाचा हाच तोटा आहे.
 
भारतात सोलोगॅमी
एकलविवाह म्हणजेच स्वतःशी लग्न करण्याचे प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. वडोदरा येथे क्षमा बिंदू नावाच्या मुलीने 8 जून रोजी स्वतःशी लग्न केलं. सामान्य लग्नाप्रमाणे सर्व तयारी केली. हे भारतातील पहिले सोलोगॅमी लग्न म्हणून प्रसिद्ध होत आहे. या लग्नात मंडप, हळद, मेंहदी, पाहुणे, लाल जोडा, जयमाळ, मंगळसूत्र, भांगेत कुंकु भरणे सर्व विधी पार पाडल्या गेल्या. आता प्रश्न पडला की बिंदूला स्वतःशीच लग्न करण्याची ही कल्पना का आली असावी तर तिच्या म्हणण्यानुसार तिला लग्न करायचे नव्हते. पण तिला वधू व्हायचे होते. जवळजवळ प्रत्येक मुलीला वधू व्हायचे असते. तिला लग्नाचा सुंदर पोशाख घालायचा होता, नटायचं होतं. त्यामुळे तिने लग्नासाठी जोडीदार न शोधण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःशी लग्न केले.
 
महिला स्वविवाह का अंगीकारत आहेत
आता प्रश्न पडतो की बहुतेक स्त्रिया एकलविवाहाकडे का जात आहेत किंवा त्या स्वतःशी लग्न का करत आहेत. खरे तर हे पाऊल उचलण्याची अनेक कारणे असू शकतात. 
 
बर्‍याच स्त्रिया सोलोगॅमीचा अवलंब करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की त्यांना स्वतःसोबत जितका आनंद वाटतो तितका त्या जोडीदारासोबत कधीच करू अनुभवता येणार नाहीत. एखाद्यासाठी सोलोगॅमीचा अर्थ असा आहे की ते एखाद्या व्यक्तीशी नव्हे तर जीवनाशी आणि स्वतःशी जोडलेले आहेत. अनेक स्त्रिया स्वत:शी लग्न करून सुटकेचा नि:श्वास सोडू शकतात, तरीही योग्य पुरुषाचा शोध काही निष्पन्न होत नाही.
 
स्त्रिया वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजुतींना चिकटून न राहता पुढे जात आहेत, सोलोगॅमीसारख्या गोष्टी त्यांच्यासाठी समजाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देखील ठरु शकतं की लग्न कधी करणार? सोलोगॅमीचा अवलंब केल्याने मुलींना स्वतःशी आणि जीवनाशी जोडलेले वाटते. यासाठी कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. अनेकांना जोडीदाराची गरज भासत नसते त्यामुळेच सोलोगॅमीकडे वळतात.
 
समाजासाठी धोक्याचे ठरू शकते का?
भारतात अशा प्रकाराची पहिलीच घटना घडली आहे. याचा विरोधही सुरु आहे. अशात देशात असा हा ट्रेंड वाढला तर वधू शोधण्यासाठी मुलांना धडपड करावी लागू शकते. तसेच कुटुंब वाढण्यासाठी, नाती जपण्यासाठी, दोन कुटुंबांना सोबत आणण्यासाठी, उत्सव, सण साजरा करण्यासाठी समाजाची गरज ही पडणारच. अशात ही पद्धत वाढली तर शेवटी एकाकीपणा हाती लागेल आणि नैराश्य देखील येऊ शकतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती