ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा " आई - मुलाचं " नातं म्हणजे " विश्व " आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.
ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.