वेगवेगळे कर्णधार असणे पटत नाही : धोनी

शनिवार, 14 जानेवारी 2017 (16:13 IST)
वेगवेगळे कर्णधार ही संकल्पना माझ्या दृष्टीने योग्य नाही. कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे मी र्मयादित षटकांच्या संघांचेही कर्णधारपद सोडले, असे कारण माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुढे केले आहे.
 
भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत माजी कर्णधाराने स्पष्ट केले की, कसोटी आणि र्मयादित षटकांसाठी दोन कर्णधार होते. हे मला पटले नाही. मी आधीच कसोटी क्रिकेटचा राजीनामा दिला होता म्हणूनच मी कर्णधारपद सोडले. याशिवाय माझ्याकडून कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारलेल्या विराट कोहलीने कुशल कर्णधार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे र्मयादित षटकांच्या संघांचे नेतृत्व करताना त्याला कोणतीही अडचण जाणवणार नाही, असे मला वाटले. कोहलीला वेळोवेळी आपण सल्ला देऊ आणि आपले क्षेत्ररक्षकांच्या स्थानावर लक्ष असेल, असेही धोनीने सांगितले. फलंदाजीतील आपल्या क्रमांकाविषयी धोनीने सांगितले, खरे तर मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून अधिक धावा करण्याची संधी मिळाली असती, पण मला वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचे हित अधिक महत्त्वाचे वाटले. माजी कर्णधाराच्या मते कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोठेही सामने जिंकू शकेल.

वेबदुनिया वर वाचा