एहसान मणी यांना प्रत्युत्तर : स्वतःच्या देशाकडे पाहा; बीसीसीआयने सुनावले

बुधवार, 25 डिसेंबर 2019 (14:49 IST)
पाकिस्तानमध्ये श्रीलंकेचा दौरा यशस्वीपणे झाल्यानंतर भारतातल्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित
करणार्‍या एहसान मणी यांना बीसीसीआयने सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महिम वर्मा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मणी यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. प्रसिध्दीमध्यमांशी बोलताना वर्मा म्हणाले, मणी यांनी प्रथम स्वतःच्या देशाकडे पाहावे. आमच्या देशाची सुरक्षा करण्यास आम्ही सक्षम आहोत.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे असल्याने त्याचे परिणाम क्रिकेटवर देखील झाले आहेत. दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेतच्या क्रिकेटचे सामने खेळतात. 'आम्ही हे सिद्ध करुन दाखवले आहे की पाकिस्तान सुरक्षित आहे. जर एखादा संघ पाकिस्तानमध्ये येण्यास तयार नसेल तर त्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे की पाकिस्तान असुरक्षित आहे. आजच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या तुलनेत भारतात अधिक धोका आहे', असे मणी म्हणाले होते. श्रीलंकेचा संघ नुकताच पाकिस्तान दौर्‍यावर आला होता. हा दौरा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांनी वक्तव्य केले होते.
 
श्रीलंकेच्या संघावर 2009 मध्वे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनी पाकिस्तानच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला. दहशवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच देशांनी पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती