राज्यातील जनतेसाठी पाच ते सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त व्हावे म्हणून पेट्रोलपंप मालक प्रयत्न करीत असतानाही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 11 ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतरही सरकारने या संघटनेला चर्चेला बोलावले नाही. राज्यात महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची संधी हे सरकार का गमावते आहे, असा सवाल करीत संघटनेने हे संपाचे हत्यार उपसले आहे.