मराठा आंदोलन: औरंगाबादमध्ये हिंसक वळण

मंगळवार, 31 जानेवारी 2017 (15:19 IST)
मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात मंगळवारी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. हर्सूलमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मोर्चेकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मराठा समाजाला आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले जात आहे. मुंबईत दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला.

वेबदुनिया वर वाचा