मराठवाड्यात मोदींची कॉंग्रेसवर सडकून टीका

बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:42 IST)
काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट बनली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी आहे, असा आरोप करताना काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली, यावेळी मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेससह महाआघाडीवर सडकून टीका केली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोठा भाऊ म्हणून संबोधले. मोदी म्हणाले, काँग्रेसने जर देशाची फाळणी होऊ नये यासाठी १९४७ मध्ये एकजूट झाली असती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा कारण त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. मोदी पुढे म्हणाले, सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही देशासमोर ठेवला आहे. तसेच सुशासन हाच आमचा मंत्र आहे. या भावनेनेच नव्या भारताच्या निर्माणासाठी आम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. एकीकडे आमच्याकडे धोरण आणि दुसरीकडे विरोधकांची विरोधी भुमिका आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून मारू ही नव्या भारताची निती असल्याचा पुनरुच्चार मोदींनी यावेळी केला. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवादाची भावना रुजवली तिथली परिस्थिती आता सामान्य आहे. घुसखोरी पूर्णपणे बंद करण्याचा आमचा संकल्प आहे. यासह मोदींनी लातूरमधील जिव्हाळा असलेल्या पाणी प्रश्नावर बोलत असताना ते म्हणाले की या भागासाठी शाश्वत पाणी साठ्य़ाची निर्मीती करणार असल्याचे मोदी म्हणाले. लातुरमध्ये तयार होत असलेला देशातील चौथा रेल्वे बोगीचा कारखाना म्हणजे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार अस्सल्याचे मोदी म्हणाले. मंचावर दोन्ही मतदार संघातील उमेदवरांसह विद्यमान खासदार उपस्थित होते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती