सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि पाकपुरस्कृत दहशतवादी कारवायांमुळे भारताने पाकिस्तानसाठी चर्चेची दारे बंद केली आहेत. या पाश्र्वभूमीवर पॅरिसमधील मोदी-शरीफ भेटीने ही कोंडी फुटण्याची अंधूकशी आशा निर्माण झाली आहे. आजपासून सुरू होत असलेल्या हवामान बदल परिषदेसाठी हे दोन्ही नेते पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांचीही भेट घेतली.
मोदी व शरीफ एकमेकांसमोर आल्यानंतर प्रथम हस्तांदोलन झाले. यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, भारतासोबत कोणत्याही अटीशिवाय चर्चा करू शकतो, असे शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील चर्चा पुढे सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत.