मुंज म्हणजे काय? नेमकी कितव्या वर्षी उपनयन संस्कार विधी केला पाहिजे?

बुधवार, 7 मे 2025 (06:00 IST)
"मुंज" किंवा उपनयन संस्कार हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. हा विधी प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील मुलांसाठी केला जातो. उपनयनाचा अर्थ आहे "गुरूकुलात नेणे" — म्हणजेच हा विधी म्हणजे विद्यार्थ्याच्या गुरुकुल जीवनाच्या प्रारंभाची घोषणा असते. यामध्ये बालकाला 'द्विज' (दुसऱ्यांदा जन्मलेला) मानले जाते. या विधीनंतर तो वेदाध्ययन व गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरतो.
 
मुंज अर्थात उपनयन विधी कोणत्या वयात करावा?
ब्राह्मण मुलांसाठी: ८व्या वर्षी (गायत्री जपास पात्र होण्याचे वय)
क्षत्रिय मुलांसाठी: ११व्या वर्षी
वैश्य मुलांसाठी: १२व्या वर्षी
सहसा मुलगा ७-१४ वयोगटात असताना हे विधी करतात.
 
मुंज करण्याचा उद्देश काय?
बालकाच्या गुरुकुल शिक्षणाचा प्रारंभ होतो.
वेदाध्ययन, गायत्री मंत्र जप, नियमीत संध्या-पूजनाला सुरुवात होते.
जबाबदारी, संयम, आचारधर्म यांची ओळख होते. व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवन शिस्तीची सुरुवात होते.
ALSO READ: Upnayan Sanskar Wishes in Marathi मुंजीच्या शुभेच्छा मराठीत
उपनयन (मुंज) विधी कसा पार पाडला जातो?
नंदी-श्राद्ध - पूर्वजांना श्रद्धांजली देऊन त्यांच्या आशीर्वादाने विधी सुरु करतात.
स्नान व वस्त्र परिधान - विधीपूर्व स्नान, नवीन धोतर/उत्तरिया परिधान केले जाते.
मुंडन किंवा चौलकर्म - सर्व केस काढून शेंडी ठेवली जाते. मुंडन कण्यामागील कारण म्हणजे केसाच्या मुळाशी असलेले दोष निघावे. तसेच शेंडी ठेवली जाते ज्याने डोक्याच्या मध्यभागी असलेल्या बुद्धीचे रक्षण होते. 
शारीरिक दृष्टिकोनातून मेंदूला थंडावा मिळतो. धार्मिक दृष्टीने, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा बिंदू (सहस्रार चक्र).
अभ्यंगस्नान- यानंतर अभ्यंगस्नान करुन सोवळं-उपरणे घालून मुलगा या बटूवेशात मुंजीसाठी तयार होतो.
मातृभोजन- व्रतबंध संस्कारात मातृभोजनाला विशेष महत्त्व आहे. आईच्या ताटात आईच्या हातून शेवटचं जेवायचं ही पद्धत असते. यानंतर बटूला अनेक नियम पाळावे लागतात. त्यापैकी सर्वात पहिला नियम म्हणजे उष्ट अन्न वर्ज्य करणे कारण उष्ट्या अन्नामुळे बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून बटूने शुद्ध, सात्विक अन्न घ्यावे, परान्न टाळावे हा यामागचा हेतू असतो.
मंगलाष्टक - यानंतर मंगलाष्टके गात अक्षता घालत बटूला आशिर्वाद दिले जातात.
उपनयन होम किंवा यज्ञोपवीत धारण - गुरु शिष्याला पवित्र त्रिपुंड धागा (यज्ञोपवीत) अर्पण करतो. तो डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असतो.
मौंजीबंधन- मुंज नावाच्या गवताची दोरी वळून ती कमरेभोवती मेखलेप्रमाणे धारण करतात. पळसाच्या झाडाचा दंड बटूकडे सोपविला जातो.
गायत्री मंत्र उपदेश: गुरु शिष्याच्या कानात गायत्री मंत्र सांगतो. हाच क्षण उपनयनाचा केंद्रबिंदू आहे.
मेधाजनन : स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा विधी केला जातो. 
भिक्षाटन: शिष्य काही घरांमध्ये भिक्षा मागतो. याचा अर्थ अहंकार न ठेवता ज्ञानासाठी विनम्र राहावे.
गुरुदक्षिणा: गुरुला दक्षिणा अर्पण केली जाते.
ब्रह्मचारी व्रत: आता मुलगा ब्रह्मचारी म्हणून वागत असल्याचे घोषित होते.
संध्या-वंदनाची दीक्षा: दररोज सकाळ-संध्याकाळ गायत्री मंत्राने संध्या करणे शिकवले जाते.
ALSO READ: मुंज मंगलाष्टके
उपनयनानंतर काय करावे?
दररोज संध्या-वंदन.
गायत्री मंत्र जप.
धार्मिक आचरण, व्रत, संयम.
योग्य वेळी गुरुकुल / शिक्षण संस्था यामध्ये प्रवेश.
 
उपनयनाचे आध्यात्मिक महत्त्व:
द्विजत्व म्हणजे केवळ शरीराने नव्हे, तर मनाने व आत्म्यानेही नवजीवन प्राप्त करणे.
ज्ञानप्राप्तीसाठी सज्ज होणे.
आत्मशुद्धी, कर्तव्यपरायणता आणि धर्माचरणाची सुरुवात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती