प्रचाराच्या तोफा थंडावल्या, गुरुवारी तिसर्‍या टप्प्यात मतदान

बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:16 IST)
मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील औरंगाबाद व जालन्यातील एकूण 19 जागांसाठी गुरुवारी, 24 एप्रिलला लोकसभेचे तिसर्‍या टप्प्यात  मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी थंडावली. राज्यातील या टप्प्यात एकूण 338 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. गुरुवारी होणार्‍या मदतानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतल्या सहा जागांवर काँग्रेसचा प्रभाव कायम राहणार की परिवर्तन घडेल याकडे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे हे दिग्गजाचे भवितव्यही 24 एप्रिलला मतदान यंत्रात बंद होणार आहे. जळगावात एकनाथ खडसे यांची स्नूषा रक्षा खडसे रिंगणात आहेत.

दरम्यान अचानक उमेदवारी रद्द केल्यामुळे विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला कुठलीही कल्पना न देता पक्षाने हा निर्णय घेतल्याचा आरोप जावळेंनी केला आहे. त्यामुळं खडसे जावळेंची नाराजी कशी दूर करतात आणि राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांच्यावर कशा रितीने सरशी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा