भारताने झिम्बाब्वेचा 6 गडी राखून पराभव केला

शनिवार, 14 मार्च 2015 (15:39 IST)
भारताने विश्व कप-2015च्या पूल-बीच्या आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला 6 गडी राखून त्याचा पराभव केला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले  होते. भारताने हे लक्ष्य सुरेश रैनाच्या नाबाद शतक (110) आणि भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नाबाद 85 धावांच्या खेळीमुळे 48.4 षटकांतच पूर्ण केले.  
 
रोहित शर्मा(१६), शिखर धवन(४), विराट कोहली (३८), अजिंक्य रहाणे(१९) हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्यानंतर रैना व धोनीने तूफान खेळी कपत विजय अक्षरश: खेचून आणला. 
 
तत्पूर्वी ब्रँडन टेलरच्या १३८ धावांच्या शानदार खेळीमुळे झिम्बाब्वेने भारतासमोर जिंकण्यासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले. नाणफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. झिम्बाब्वेची सुरूवात संथ झाली आणि त्यांचे सलामीचे फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र त्यानंतर ब्रँडन टेलरने भारतीय गोलंदाजी चोपून काढत १३८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने  पावणेतीनशे धावांचा टप्पा पार केला. भारतातर्फे मोहम्मद शमी, मोहित शर्मा व उमेश यादवने प्रत्येकी ३ तर आर. अश्विनने १ बळी टिपला.
 
रोहित शर्मा व शिखर धवनने भारताला सुरूवात तर चांगली करून दिली, मात्र ६व्या षटकांत ते दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १९ धावा काढून बाद तंबूत परतला. ३८ धावांची खेळी करणारा विराट कोहली तरी भारताला सावरेल आणि विजयाच्या समीप नेईल असे वाटत होते, मात्र सिकंदर रझाच्या गोलदांजीवर तोही बाद झाला आणि भारताने महत्वाचे चार गडी गमावले. त्यानंतर रैनाने धोनीच्या साथीने सावधपणे खेळून भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्या पनयानगराने २ तर सिंकदर रझाने १ बळी टिपला.
 
ब्रेंडन टेलरने विश्व चषकात आपल्या शेवटच्या सामन्यात शानदार प्रदर्शन करून सर्वाचे लक्ष्य वेधले. भारताकडून तिन्ही जलद गतीचे गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहित शर्मा यांनी तीन तीन बळी घेतले. तसेच अश्विनला मात्र 1 विकेट मिळाले. 

वेबदुनिया वर वाचा