Book Review - पुस्तक परिचय

शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (10:42 IST)
प्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावणारा कवितासंग्रह - मन पारंब्या
 
आज कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील भेटले बर्‍याच दिवसातून भेटल्यामुळे काही गप्पा झाल्या. त्यानंतर नवीन काही वाचावयास बर्‍याच दिवसामध्ये न मिळाल्याची खंत मी त्यांना व्यक्त केली. खंत व्यक्त करतो ना करतो सरांनी क्षणाचाही विलंब न लावता कवी तेजाकांत यांचा मन पारंब्या नावाचा कवितासंग्रह मला वाचावयास दिला आणि प्रस्तावना ही लिहिण्यास सांगितली. कवी तेजाकांत यांचा मन पारंब्या कवितासंग्रह वाचत असताना मी हरवूनच गेलो. कारणही तसेच आहे, यातील सुरूवातीच्या कविता ह्या प्रत्येक व्यक्तीला आत्मपरिक्षण करण्यास नक्कीच मदत करतील.
 
मन पारंब्या या कवितासंग्रहातील वैयक्तीकरित्या माझ्या मनाला भिडलेली कविता म्हणजे,  त्याला काय होतयं? खूपच छान शब्द रचना त्याच बरोबर कमीत कमी शब्दांमध्ये अनेकांच्या मनाला स्पर्श करणारी अशी कविता आहे. अनेक वाईट गोष्टी जेव्हा स्वतः बरोबर घडतात तेव्हा माणूस दुःखी होतो, परंतु इतरांच्या बाबतीत घडल्या तर सहजपणे बोलून जातात त्याला काय होतयं.
 
आयुष्याच्या या प्रवासात
अशाही अनेक परिक्षा येतात
कितीही अभ्यास केला तरी
हमखास नापास करून जातात.
 
आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे, त्यामध्ये सुख-दुःखाची अनेक पाने असतात. तसेच यश-अपयश हे सुद्धा भरलेले असते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्य जगत असताना दररोज एक नवीन धडा अभ्यासावा लागतो. दुःखाचं किंवा अपयशाचं एखादं पानं आलं म्हणून पुस्तक फेकून द्यायचं नसतं. तर ते पान पलटून पुन्हा खंबीरपणे उभा रहायचं असतं. जीवन ही एक शाळा म्हणता येईल ही शाळा शिकत असताना प्रत्येक व्यक्ती कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे किंवा पुढे कोणता पेपर आहे हे कोणालाही सांगता येत नाही त्यासाठी प्रत्येक परीक्षेला सामोरे जाणारा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो.
 
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरतेती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही.
 
अनेक व्यक्ती ह्या देवा समोर भिकार्‍यासारखी भिक मागताना आपण पाहतो आणि देवळाच्या बाहेर जे भिकारी बसलेले असतात त्यांच्या समोर स्वतः देव असल्याचा अहंकार मनी बाळगत असतात.
 
कवी तेजाकांत यांनी दिस सुर्याजीचा या कवितेमध्ये खुपचं छान पद्धतीने प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या लिहिली आहे. अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये संपूर्ण दिवस सामावून घेतला आहे. जीवन जगत असताना कोणत्याही कठीण प्रसंगी एकच वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे हार कधीच मानणार नाही मी हे वाक्य प्रत्येक क्षणोक्षणी मनात ज्वलंत ठेवा यश नक्कीच मिळेल.
 
या धावपळीच्या जीवनामध्ये नक्की कोठे थांबायचं आहे हेच अनेकांना माहित नसते किंवा ज्यांच्यासाठी आपण ही धावपळ करत आहे, त्यांना आपण आनंद देवू शकलो नाही तर ही होणारी धावपळ व्यर्थ आहे असे समजले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम मन पारंब्या या कवितासंग्रहातून नक्की मिळतील प्रत्येकाने हा कवितासंग्रह जरूर वाचावा.
 
- मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक)

वेबदुनिया वर वाचा