'मी टू' प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. लैंगिक छळाच्या आरोपांबाबत नाना पाटेकर यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळून लावली. अभिनेत्री तनुश्री दत्ताने दाखल केलेल्या तक्रारीत लैंगिक छळाचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हणत मॅजिस्ट्रेट कोर्टाने तनुश्री दत्ताची याचिका फेटाळून लावली.
तनुश्री दत्ताने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात नाना पाटेकर आणि इतरांविरुद्ध विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याची सुनावणी मॅजिस्ट्रेट नीलेश बन्सल यांच्यासमोर झाली. नाना पाटेकर यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने अखेर तनुश्रीने दाखल केलेली तक्रार फेटाळून लावली.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 मध्ये एका नृत्य दृश्यादरम्यान नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात ओशिवरा पोलिस ठाण्यात या चौघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
तनुश्री दत्ताने तिच्या तक्रारीत नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, अब्दुल सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही असा अहवाल दाखल केला. त्यानंतर तनुश्री दत्ताने डिसेंबर 2019 मध्ये निषेध याचिका दाखल केली, ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील चौकशी आणि कारवाईची विनंती करण्यात आली. मात्र, आता न्यायालयाने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा दिला आहे.