ओबीसींना फसविले की मराठ्यांना असा प्रश्न--- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

रविवार, 28 जानेवारी 2024 (10:40 IST)
शिंदे- फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने दिले याचं स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. असे सांगून सरकारने आरक्षण देताना नेमके कोणाला फसवले आहे ?ओबीसींना फसविले की मराठ्यांना असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच भाजपचे सरकार हे रामराज्य़ नसून रावणराज्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या विभागाचा जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीपुर्वी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.
 
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “पहिला प्रश्न हा आहे कि, मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणस्थळी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत ? तसेच जणगणनेच्या आधारावर आरक्षण द्यायला पाहीजे पण मराठा समाजामध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम शिंदे- भाजप सरकारने केले आहे. तसेच हे आरक्षण देताना ओबीसी आणि मराठा समाजापैकी कोणाला कसे आणि किती आरक्षण दिले याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे. मराठा आरक्षण देताना सरकारकडून फसवाफसवीचे राजकारण होत आहे. त्यामुळे हे फसवे सरकार आहे. आरक्षणाचा अध्यादेश फडणवीस यांनीही काढला होता, तेच आताही केले आहे.” असाही टोला नाना पटोले यांनी सरकारला लगावला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती