कडक रोझे ठेवणार्‍याकडे आदराने पाहिले जाते

रमझान महिना संपल्यावर जेंव्हा प्रथम चंद्र दर्शन होते तेंव्हा ईद साजरी होते. रमझान-ईदच्या दिवशी नवे-नवे कपडे लेऊन, एकमेकांना आलिंगन देऊन ईदची 'मुबारक बात' दिली जाते. मटण, चिकन, वेगवेगळ्या बिर्याण्या, गोडधोड पदार्थ, सुकामेवा ह्यांची रेलचेल असते. एकमेकांच्या घरी 'ताटे' पाठविण्याचाही प्रघात आहे. १०-१२ वर्षाच्या मुली कलाबुतींनी मढविलेले वस्त्रप्रावर्ण लेऊन ही 'ताटे' आपापल्या नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे घेऊन जाताना दिसतात. गरीबांची मुले घरोघर 'ईदी' (बक्षीस) मागत फिरतात. (त्या भीक म्हणत नाहीत) 'ईदी' कोणीही कुणालाही (वयाने मोठी व्यक्ती, लहान व्यक्तीस) गरीब श्रीमंत भेदभाव विसरुन देऊ शकतो. राजाही ईदीचा हकदार असतो. घरात आई-वडील, मोठे बहीण-भाऊ लहानांना 'ईदी' म्हणून पैसे, वस्तू देऊन खूष करतात. 

वर्षभराची महत्त्वाची मोठी खरेदी रमझान ईदच्या मुहूर्तावर केली जाते. नवीन घर, नवीन गाडी, महागातील इलेक्ट्रॉनिक वस्तू (टीव्ही, व्हिसीआर, डिव्हिडी प्लेअर इ.), जून्या घराचे रंगकाम, कपडे, अत्तरं इ. अनेक गोष्टींची खरेदी रमझान ईदच्या मुहूर्तावर होते. रमझान ईद विखुरलेले कुटुंब एकत्र येऊन साजरे करतात. नोकरी-धंद्या निमित्त, कुटुंब विस्तारामुळे, गृहकलहानेही वेगळी झालेली भावंडे आपापल्या कुटुंबासमवेत ईदसाठी मतभेद विसरून ईद साजरी करायला एकत्र येतात. (मुख्यतः कुटुंबप्रमुखाच्या निवासस्थानी) त्या दिवशी जूने मतभेद उकरून काढून कोणी भांडायचे नसते. सर्व हसते-खेळते वातावरण असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती