शिवसेनेची भाजपवर टीका : भाजप मुक्त भारत होतेय कॉंग्रेस मुक्त नाही

बुधवार, 12 डिसेंबर 2018 (16:38 IST)
भाजपा मित्र पक्ष शिवसनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे  हवेत उडत होते त्यांना जमिनीवर लोकांनी पाडले आहे. शिवेसेनेने अग्रलेखात मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपने कॉंग्रेस मुक्त संदेश दिला मात्र लोकांनी भाजप मुक्त करून दाखवले आहे. राहुल हे काय करतील असा समज शहा आणि मोदी यांनी केला होता, मात्र झाले उलटेच. जनतेने नवीन पर्याय न शोधात आहे तो पक्ष स्विकारत भाजपला मुलापासून उखडून टाकले आहे. विशेष म्हणजे हिंदी पट्टा जो आहेत तेच ठरवतात केंद्रात सत्ता ठरवतो त्यामुळे जनतेचा कौल आता लक्षात आला असून भाजपाचे सद्दी संपणार असे चिन्ह आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. वाचा काय आहे सामनाच्या अग्रलेखात : 
 
हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, श्री. मोदी व श्री. शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत!
 
पाच राज्यांत काय होईल याची गणिते आणि जमाखर्च मांडले जात होते. भारतीय जनता पक्षाला एकाही राज्याचे गणित धडपणे सोडवता आले नाही व राहुल गांधी यांचा ‘पेपर’ कोरा आहे असे ज्यांना वाटत होते त्यांची गणिते कोलमडली आहेत. पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी ‘मेरिट’ म्हणजे गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला आहे. मोदी यांचा उदय व भाजपची विजय यात्रा ज्या राज्यांतून सुरू झाली तेथेच भाजपच्या रथाची चाके रुतली. मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे ‘चेहरा’ आहेत असा ठराव संमत झाल्यानंतर चार राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या (चूकभूल द्यावी-घ्यावी) व तेथे प्रचंड विजय मिळवून ‘हा मोदी यांचा पायगुण बरं का!’ अशा घंटा बडवण्यात आल्या. आता मोदी पंतप्रधान असतानाच याच चार राज्यांत भाजपला ‘जबर’ फटका बसला आहे. यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान हे तर भाजपचे अभेद्य गड होते व या गडांना असे खिंडार पडेल असे कुणाला वाटले नव्हते. छत्तीसगडमध्ये रमणसिंह हे मजबूत होते. तेथे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवून भाजपचे पानिपत केले. भाजपच्या चाणक्य मंडळाने अजित जोगी यांना फोडले व वेगळा पक्ष स्थापन करायला लावून निवडणुकीत उतरवले. ही चाणक्य नीती मोडून काढून छत्तीसगढमध्ये काँग्रेस विजयी झाली. मध्य प्रदेशात नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ‘मामाजी’ शिवराजसिंह चौहान यांचा चेहरा लोकप्रिय होता. भाजपचे संघटनही रुजले होते. त्यामुळे काही झाले तरी शेवटी शिवराज हे बहुमताचा आकडा गाठतील असा माहोल होता. तेथे काँग्रेसने भाजपच्या सिंहाची आयाळ धरून गदागदा हलवली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे यांनी धूमशान केले व राहुल गांधी यांनी संपूर्ण राज्य ढवळून काढले आणि मध्य प्रदेशात भाजपचा रथ रोखला. राजस्थानात काँग्रेसचे सरकार बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तेथे काँग्रेसला 140 च्या आसपास जागा मिळतील असे वातावरण होते, पण मुख्यमंत्रीपदाच्या अंतर्गत लाथाळ्या आणि गटबाजीने काँग्रेसचा आकडा कमी केला. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षाने राजस्थानात काँग्रेस पक्ष शंभर जागांच्या थोडा पुढे जाऊन थांबला. पण शेवटी त्या पक्षाचे बहुमताचेच सरकार तेथे बनणार आहे. अशा तऱ्हेने हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. मिझोराममध्ये स्थानिक पक्षाने बाजी मारली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, श्री. मोदी व श्री. शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे. सरकारे ही फक्त निवडणुका लढवून जिंकण्यासाठीच आहेत, या देशांत भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाने टिकू नये व राहिलेच तर भाजपचे मांडलिक म्हणूनच राहावे या प्रवृत्तीचा पराभव चार राज्यांत झाला आहे. भाजपने आधी मित्रांना गमावले व आता महत्त्वाची राज्ये गमावली. थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही. राजस्थानात शेतकरी अडचणीत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती