कृष्णाला रुक्मिणी मिठासारखी आवडते!

एकदा कृष्ण आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा करीत बसले होते. गप्पांमध्ये सत्यभामेनं विचारले की नाथ मी आपल्याला किती आवडतेस? त्यावर कृष्ण म्हणाले, हे 'सत्यभामे ! तू मला साखरेप्रमाणे आवडतेस. लगेच रुक्मिणीनेही हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, रुक्मिणी खरं सांगतो तू मला मिठासारखी आवडतेस.
 

हे ऐकून सत्यभामा खूप खूश झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रुक्मिणी रुसून बसली की की मिठाप्रमाणे. रागात रुक्मिणी तिथून निघून जाते. आपल्या प्रिय रुक्मिणीला रागावले बघून दुसर्‍या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मीठ न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोड- धोड पदार्थही करायला सांगितले. 
 
स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाणे जेवले. परंतू जेव्हा रुक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत. आधीच रागात असलेली रुक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली, स्वयंपाक पार अळणी झालाय. भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, 'आज मीठ संपलं होत म्हणून स्वयंपाक अळणी करणं भाग पडलं.
 
अर्धपोट जेवून उठली रुक्मिणी महालात फेर्‍या मारू लागली. तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले की जेवण एवढ्या लवकर कसे झाले ? आज तर गोडा-धोडाचा आस्वाद घेतला नाही वाटतं. त्यावर रुक्मिणी रागाने म्हणाली, गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदी अळणी होते. मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव नव्हती. यावर कृष्ण म्हणाले, मीठ नसल्याने स्वयंपाकाला चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मिठासारखी आवडतेस म्हटल्यावर तू रागावली. पतीच्या बोलण्यातला अर्थ समजून रुक्मिणीची कळी एकदम खुलून गेली.

वेबदुनिया वर वाचा