'समाजवादी' संत रविदास

संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत. 

रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.

पराधिनता पाप है जान लेहु रे मीत
रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत
सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.

रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्‍यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे.

एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा
रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा

सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.

समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.

ऐसा चाहो राज्य में, जहां मिले सबन को अन्न
छोट बडो सब सम बसे रविदास रसे प्रसन्न

रविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रविदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती