राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन असून त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली ५१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आहे. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे.  दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
 
कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आतापर्यंत  फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण कोरोना बाधित आढळले असून इतर ७ जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
 
पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.
 
राज्यात  ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील  १लाख ८९ हजार ८८८  प्रवासी तपासण्यात आले आहेत.
 
राज्यात बाधित भागातून एकूण १०६३  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती