शरद पवारांना नरेंद्र मोदींचा फोन आलेला नाही - मलिक

बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (12:07 IST)
शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठलाही फोन आलेला नाही, या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
 
भाजप अफवा पसरवून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
लोकांनी आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे. जर हे सरकार पडत असले तर आम्ही प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
 
पक्षांच्या बैठकांना सुरुवात
 
मुंबईत आज भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित रहाणार आहेत
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मुंबईतल्या कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता आणि विरोधीपक्ष नेता कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
 
तर आज दुपारी ४.०० वाजता दादरमधल्या टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
 
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
 
सोनिया-पवार चर्चा
शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती