ठाणे - बळीप्रतिपदेच्या दिवशी गुरा-ढोरांना पेटत्या आगीतून उडवत शेतकऱ्यांची दिवाळी

शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (17:17 IST)
बळीप्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशीच शेतकऱ्यांच्या घरोघरी असलेल्या बैलांची स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून छान सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घुंगरू, हार घालून त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे संकट आल्याने त्या पेटत्या आगीची पूजा करून देशावरील कोरोनाचा संकट लवकर टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, प्रार्थना करण्यात आली. 
 
महत्वाचे म्हणजे जिल्ह्यतील आगरी, कोळी, कुणबी शेतकरी गुरांना पूज्यनीय मानून गुरांच्या सोबतीने तो स्वत: शेतात राबतो. शेतकऱ्यांची बहूतांश कामे दिवाळीत आटोपतात. कृतज्ञता म्हणून दिवाळीत गुरांचा खास सण साजरा करतात. ग्रामीण आदिवासी भागात रूढ झाली असून तीच परंपरा आजही शेतकरी बांधव कुटुंबासोबत जपताना दिसत आहे, एकंदरीत दिवाळी हा सण ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जात असल्याचे आपणास पहावयास मिळते.
 
शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलेही या प्रथेचे करतात सर्मथन -
 
शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलांच्या मते, बऱ्याच वेळा गुरांच्या अंगाला पिसवा, गोचिड चिटकलेल्या असतात. त्यामुळे पेंढ्याची आग करून त्या वरून गुरांना उडवतात, ही आग पेंढ्याची असल्याने सौम्य असते, लाकडा सारखे निखारे या आगीत नसतात. या शेकोटी वरून गुरांना उडवल्यावर त्यांच्या अंगावरील जंतू धुरामुळे गळून पडतात. नष्ट होतात. आगीचे भय गुरांना रहात नाही. पुढे कधी यदाकदाचित रानात वणवा पेटल्यास गुरे सैरभैर होत नाहीत. शिवाय सोबत गावातील जाणकार माणसे मदतीला सतर्क असतातच. तर हिवाळ्याच्या दिवसात आगीवरून गुरे उडवून त्यांना उबदार शेक मिळवून देण्याची पारंपारीक पद्धत शास्त्रीयदृष्ट्या योग्यच आहे. तथाकथीत प्राणी मित्रांनी काळजी करण्यासारखे काहीच कारण नसल्याचे सांगत या प्रथेचे सर्मथन केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती