महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही तासांवर आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ईव्हीएमला घेऊन नवा वाद सुरु झाला आहे. ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत पाडू उपकरणाच्या मदतीने मत चोरी होत असल्याचा खळबळजनक गंभीर आरोप निवडणूक आयोगावर लावला आहे.
शिवतीर्थावर घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीत ईव्हीएमला पाडू नावाचे एक उपकरण जोडले जाणार आहे. हे उपकरण नेमके काय काम करते, कसे काम करते, या उपकरणाचे उद्धिष्ट काय आहे या बाबत निवडणूक आयोगाने काहीच माहिती दिलेली नाही. हे नवीन उपकरण मतचोरी करण्यासाठी तर नाही न असा प्रश्न राज ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. “जर लोकशाहीत मतदारांचा विश्वासच उडाला, तर निवडणुका घेण्याला काय अर्थ आहे?” असा सवाल त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. बऱ्याच वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर आल्याने आणि त्यांनी थेट ईव्हीएमच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
PADU हे युनिट निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी किंवा तांत्रिक मदतीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, राज ठाकरे यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या उपकरणाच्या माध्यमातून मतदानाची आकडेवारी बदलली जाऊ शकते किंवा विशिष्ट उमेदवाराला फायदा होईल अशा पद्धतीने प्रोग्रामिंग केले जाऊ शकते. निवडणूक आयोगाने यावर तातडीने खुलासा करावा, अशी मागणी आता ठाकरे गटाकडून आणि मनसेकडून केली जात आहे.