संभाजीराजे छत्रपती : 'उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे उपोषण करावं लागतंय'

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:43 IST)
माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मला उपोषण करावं लागत आहे, असं वक्तव्य राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
 
मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणास बसले आहेत. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
 
आज सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून संभाजीराजे यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यासुद्धा यावेळी उपोषणात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
संभाजीराजे उपोषणास बसल्यानंतर विविध नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांचा सहभाग होता.
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड तसंच माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आदी नेत्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत काहीवेळ उपोषणास्थळी व्यासपीठावर उपस्थिती नोंदवली.
 
आमरण उपोषणाचा दिला होता इशारा
महाराष्ट्र सरकारनं मागण्या त्वरित मान्य न केल्यास 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिला होता.
 
26 तारखेपासून पूर्णपणे अन्नत्याग करणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली.
 
मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ताय द्यायला काय हरकत आहे?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
 
संभाजीराजे यांच्या 14 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदतले मुद्दे
राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असं संभाजीराजेंना जाहीर केलं आहे.
 
त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे असे आहेत.
 
सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.
वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.
कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?
आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे.
राज्य सरकारनं वरील मुद्दे त्वरित सोडवले नाहीत, तर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार. पूर्णपणे अन्नत्याग करणार. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार, असा इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे.
 
सरकारनं वरील मागण्या मान्य कराव्या ही सरकारला विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती