ती' गावे पुन्हा महाराष्ट्रात सामील घेण्याचा आमचा प्रयत्न : भुजबळ

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:00 IST)
महाराष्ट्रातील ४० ग्रामपंचायतींनी  आम्हाला  कर्नाटकात सामील करा,अशी मागणी केल्याचा दावा  कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केल्याने तेथील नागरिकांमध्ये संभ्रम असल्याची बाब  कॉंग्रेसचे जतचे आमदार  विक्रम सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडली. यावर उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच सीमाप्रश्न समन्वय मंत्री छगन भुजबळ यांनी  महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात तेथील सीमेवरील जी गावे कर्नाटकात गेली आहेत त्यांना  पुन्हा महाराष्ट्रात सामील घेण्याचा आमचा प्रयत्न राहील,अशी ग्वाही दिली.
 
विक्रम सावंत यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात समावून घेण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरु असल्याकडे लक्ष वेधले. यावर बोलताना भुजबळ यांनी कर्नाटक सीमावर असलेले महाराष्ट्रातील कोणतेही गाव कर्नाटकात जाणार नाही असे निक्षून सांगितले. दरम्यान,जत तालुक्यातील गावांना पाणी मिळत नसल्याचा मुद्दाही  सावंत यांनी मांडल्यानंतर  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाकडून ६५ गावांना सहा  टीएमसी पाणी म्हैसाळ येथून देण्याची योजना करण्यात आली असून तांत्रिक बाबीही पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.जलसंपदा  विभागाच्या या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे. यानंतर लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी  दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती