बेशुद्ध पत्नीची लाकडाच्या ढिगाऱ्यावर जाळून केली हत्या

शुक्रवार, 10 जून 2022 (07:55 IST)
ठाणे – निर्दयी पतीने कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर पतीने तिला घरता जळणासाठी साठविलेल्या लाकूड फाट्याच्या ढिगाऱ्यावर ठेवून जिवंत जाळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरालगत चाविंद्रा परिसरातील एका चाळीत घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष चौरसिया (वय 35 वर्षे), असे बेड्या ठोकलेल्या आरोपी पतीचे नाव आहे तर कविता चौरसिया (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कविता व तिचा पती संतोष हे दोघे त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा भागातील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते. मोलमजुरी करणारा संतोष चौरसिया हा व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने काही काम करीत नसल्याने त्याचे पत्नी कवितासोबत नेहमीच भांडण होत असे. मंगळवारी (7 जून) रात्रीच्या सुमारास संतोष घरी दारू पिऊन आला. त्यानंतर पत्नीशी कौटुंबिक वादातून भांडण सुरू केले. यावेळी वाद विकोपाला गेल्याने आरोपी संतोषने पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करत तिचे डोके लोखंडी कपाटावर आदळले. यामध्ये कविता बेशुद्ध पडली. तिची हालचाल न जाणवल्याने पती संतोषने घराबाहेर पडवीत पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्या जवळ तिला फरफटत आणून लाकडांवर बेशुद्ध पत्नीला ठेवून तिची जिवंत जाळून हत्या केली.
 
घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पत्नीचा मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. तर सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात या हत्येनंतर फरार झालेला पती संतोष चौरसियाला बुधवारी (8 जून ) रोजी भिवंडीतून ताब्यात घेतले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती