महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in किंवा results.digilocker.gov.in वर ऑनलाइन पाहू शकतील. याशिवाय, डिजिलॉकर अॅपवर डिजिटल मार्कशीट देखील उपलब्ध करून दिली जाईल. मंगळवार (6 मे) पासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येतील.
महाराष्ट्र 12 वी बोर्ड परीक्षा 2025 ही पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन पाहता येतील आणि निकालाची प्रिंटआउट घेण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. त्याच वेळी, कनिष्ठ महाविद्यालये त्यांचे एकत्रित निकाल कॉलेज लॉगिनद्वारे तपासू शकतील.
विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थी 6 मे ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतील. अर्ज करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल. विद्यार्थी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांमधून देखील अर्ज करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांच्यासाठी बोर्डाने एक महत्त्वाची अट घातली आहे. पुनर्मूल्यांकनापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर, विद्यार्थ्यांना विहित शुल्क आणि प्रक्रियेनुसार पाच कामकाजाच्या दिवसांत ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होईल आणि त्याचे निकाल सप्टेंबर2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी 15,13,909 विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत (महाराष्ट्र बारावी परीक्षा) बसले होते. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.