अजित पवारांवर सोमय्या यांची खोचक टीका

बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:28 IST)
जरंडेश्वर साखर कारखाना आणि आयकर विभागाच्या छापेमारीनंतर किरीट सोमय्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. सोमय्यांनी अजित पवारांची बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा केला असून नियमांचे उल्लंघन केलं आहे. यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही असे सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवारांवर नेटफ्लिक्सने वेबसीरिज केल्यास पवारांना २०० ते ३०० कोटी रॉयल्टी मिळेल आणि त्यात पहिल्या सीजनमध्ये अजित पवार असतील अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
 
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच छापेमारी आणि घोटाळ्याच्या बाबतीमध्ये नेटफ्लिक्सने वेब सीरिज करायची झाल्यास अजित पवारांना रॉयल्टीमधून २०० ते ३०० मिळतील असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
 
राज्यातील ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगल्यांची संपत्ती उभी करु शकतात तर पवार काहीही करु शकतात असे सोमय्या यांनी म्हटलं आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये ९०.५ टक्के शेअर आहेत. एकूण २७ जणांचा लेअर करण्यात आला आहे. ९०.५ टक्के शेअर हे स्पार्कलिंग सॉईल कंपनीचे आहेत. या कंपनीचे मालक संचालक या सुनेत्रा पवार आणि अजित अनंतरराव पवार आहेत. याला म्हणतात परिवार असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
सोमय्यांनी अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचे सांगितले आहे. एस व्ही ज्वेल ही कंपनी शेल कंपनी आहे. २३ एप्रिल २००९ रोजी सेबीने प्रतिबंधीत केलेली ही बोगस कंपनी आहे. ठाकरे सरकारच्या ३ मंत्र्यांनी या कंपन्यांच्या आधारे काळा पैसा सफेद केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे पवार सरकार घोटाळेबाज सरकार आहे. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणे हे आमचं लक्ष्य असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती