निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला

गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (08:18 IST)
पक्ष फोडा आणि भ्रष्टाचार करा हीच सध्या मोदी गॅरंटी आहे. तुमचा पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्यात या मग आम्ही तुम्हाला पवित्र करू ही सध्याची मोदी गॅरंटी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर टोलेबाजी केली आहे. आजचा निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही. अमित शहा आणि मोदी यांच्या मालकीचा हा आयोग झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला असेही त्यांनी म्हटले आहे.
 
‘‘जे शिवसेनेबाबत झाले तेच शरद पवारांबाबत घडले. पक्षाचे संस्थापक बसले आहेत निवडणूक आयोगासमोर जाऊन, निवडणूक आयोगाने पक्ष दुस-याच्या हातात सोपवला. यालाच सध्या मोदी गॅरंटी म्हणतात. मोदी गॅरंटी कुठली असेल तर हीच की पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करू, ईडी लावू, सीबीआय लावू. त्यानंतर तुमचाच पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला पवित्र करू आणि आमच्याबरोबर घेऊ ही मोदी गॅरंटी. नॅशनालिस्ट करप्ट पार्टी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. अजित पवारांवर सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. आज काळाने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे. तोच पक्ष मोदी आणि शहा यांनी अजित पवारांना दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती