"तुम्हाला लाज वाटली पाहिजे..."; बच्चू कडूंकडून भुसावळ नगरपालिका अधिकाऱ्यांना खडे बोल

शनिवार, 28 मे 2022 (08:05 IST)
गोर गरीब जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करून त्यांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या )मुख्याधिकाऱ्यास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कडक शब्दात फटकारले. आज झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहे. ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करू नये?
 
गरीब जनतेला त्यांच्या हक्कापासूनवंचित ठेवल्याबद्दल लाथा घातल्या पाहिजे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा कडक शब्दात कडू यांनी आपला संताप व्यक्त केला आहे
 
केवळ रस्त्याची कामांना प्राधान्य देत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना, पंतप्रधान गृह निर्माण योजनेचा विसर पडल्याने बच्चू कडू यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना चांगलेच धारेवर धरत त्यांची कानउघडणी उघडणी केली.
 
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठकीत अ दर्जाच्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांकडून बच्चू कडू यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अनेक बाबी सांगता आल्या नाहीत. एवढेच काय तर गोर गरीब जनतेसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या नसल्याचं लक्षात आले. त्यानंतर बच्चू कडू यांचा संताप अनावर झाला. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केली आहे.
 
गरीब जनतेचे काम न करणाऱ्या तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाथा घातल्या पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला आहे.
 
भुसावळ नगरपालिकेच्या वतीने रमाई योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकाही लाभार्थ्यांना अद्याप घर देण्यात आलेली नाही. हा मुख्याधिकार्‍यांनी दलितांवर अन्याय केला जात असून मुख्याधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करू नये? असा सवाल त्यांनी केला. याबाबत त्यांनी ८ दिवसांत अहवाल मागवला आहे. दरम्यान कामात कसूर करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बच्चू कडू यांनी चांगलीच कानउघडणी केल्याने उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी ही चांगलेच धास्तावले असल्याचं या वेळी पाहायला मिळाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती