काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार

मंगळवार, 31 मार्च 2015 (10:35 IST)
काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या बडगाम जिल्ह्यात 4 ते 5 घरे दरडीखाली दबली आहेत. आतापर्यंत ढिगार्‍याखालून 10 मृतदेह काढण्यात आलेत तर 21 जण अजूनही बेपत्ता आहेत. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएच्या जवानांचे मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
 
दरडी कोसळल्याने श्रीनगर-जम्मू हायवेवरची वाहतूक ठप्प झाली आहे. झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडत विक्राळ रूप धारण केल्याने श्रीनगरमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएङ्खच्या 100 जवानांसह खाद्यान्न आणि इतर मदतीचे सामान घेऊन हवाई दलाचे विमान भटिंडाहून श्रीनगरला रवाना झाले आहे. काश्मीरमधील परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएङ्खच्या जवानांची आणखी चार पथके केंद्र सरकारने सज्ज ठेवली आहेत.
 
काश्मीरमधील पुराची माहिती घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरमधल्या पूरस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला हवी ती मदत देण्यास तयार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी एक उच्च अधिकार्‍यांचे पथकही पाठवले आहे. काश्मीरमधील पूरस्थितीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची भेट घेतली आहे.   

वेबदुनिया वर वाचा