सराफांचा पुन्हा बंद

शनिवार, 23 एप्रिल 2016 (11:34 IST)
अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवारपासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 मागील दहा दिवस केंद्र सरकार व सराफांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुमारे ७० टक्के मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काही मुद्यांवर तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीमध्ये देशातील विविध सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीमध्ये देशपातळीवर ऑल इंडिया अ‍ॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली.
 
अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका  म्हणाले, सहमती झालेल्या मुद्यांचे रुपांतर कायद्यात होणे आवश्यक आहे. त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा