सातव्या टप्प्यातील मतदान, राहुल गांधी म्हणाले-देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार

शनिवार, 1 जून 2024 (13:45 IST)
देशातील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
 
राहुल गांधींनी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. “आज मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा आहे. आतापर्यंतचा मतदानातील ट्रेंड पाहता, देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. कडक उन्हातही तुम्ही सर्वजण लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मतदानासाठी बाहेर पडला, याचा मला अभिमान आहे"असंही राहुल गांधी म्हणाले.
 
“आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि अहंकार आणि अत्याचाराचं प्रतिक बनलेल्या या सरकारवर तुमच्या मताने 'अंतिम प्रहार' करा. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे," असंही राहुल गांधी म्हणाले.
 
दुसरीकडं कन्याकुमारीमध्ये ध्यान करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट केली. “लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहानं सहभागी होण्याची विनंती करतो. तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील, अशी आशा आहे,” असं मोदींनी म्हटलं.

Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती