उत्खननात हस्तिनापुरा सापडले ?

मंगळवार, 31 जुलै 2018 (09:06 IST)
उत्तर प्रदेशातील बागपत येथील उत्खननात पुरातत्व खात्याच्या हाती रथ, तलवारी, शवपेटी, मानवी सांगाडे लागले आहेत. हे सगळे अवशेष महाभारताच्या काळातील असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. साधारणपणे ४ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीतील ही चिन्हे असून सध्या दिल्लीच्या लाल किल्ल्यात ठेवण्यात आली आहेत. पुरातत्व खात्याने सनौली येथे उत्खनन केले आहे. हे ठिकाण कौरवांच्या हस्तिनापुरापासून जवळ आहे. त्यामुळे उत्खननात सापडलेली सर्व चिन्हे, अवशेषं ही योद्धा घराण्याशी संबंधित म्हणजेच महाभारत काळाशी संबंधित असल्याची शक्यता आहे. मात्र पुरातत्व खात्याने तसे स्पष्ट केलेले नाही. 
 
हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातही एवढय़ा चांगल्या अवस्थेतील अवशेष सापडलेले नव्हते.  हडप्पा संस्कृती आणि गौतम बुद्धांचा जन्म या कालखंडातील दुवा उलगडण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी नेमके कुणाला पूरण्यात आले होते, त्यांचे जीवनमान कसे होते, मृत्यू कसा आला, याबाबत अधिक संशोधन आता होणार आहे. सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आधुनिक सिटी स्कॅन, एक्स रे, इफ्रारेड फोटोग्राफीच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती