ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

बुधवार, 5 मार्च 2025 (11:47 IST)
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
 
देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु | अवधारिजो जी ||२||
 
हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष |
तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||
 
स्मृति तेचि अवयव | देखा अंगिकभाव |
तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||
 
अष्टादश पुराणे | तीचि मणिभूषणे |
पदपद्धती खेवणे | प्रमेयरत्नांची ||५||
 
पदबंध नागर | तेचि रंगाथिले अंबर |
जेथ साहित्यवाणे | सपूर उजाळाचे ||६||
 
देखा काव्यनाटका | जे निर्धारिता सकौतुका |
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनी || ७||
 
नाना प्रमेयांचि परी | निपुणपणे पाहता कुसरी |
दिसती उचित पदे माझारी | रत्नें भली || ८||
 
तेथ व्यासादिकांच्या मति | तेचि मेखळा मिरवती |
चोखाळपणे झळकती | पल्लवसडका || ९||
 
देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती ||
म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || १०||
 
तरी तर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु |
वेदांतु तो महारसु | मोदकाचा || ११ ||
 
एके हाति दंतु | जो स्वभावता खंडितु |
तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा || १२ ||
 
मग सहजे सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु |
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु || १३ ||
 
देखा विवेकमंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु |
जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा || १४ ||
 
तरी संवादु तोचि दशनु | जो समताशुभ्रवर्णु |
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु | विघ्नराजु || १५ ||
 
मज अवगमलिया दोनी | मीमांसा श्रवणस्थानी |
बोधमदामृत मुनी | अलि सेविती || १६ ||
 
प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ |
सरिसे एकवटत | इभ मस्तकावरी || १७ ||
 
उपरि दशोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे |
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली || १८ ||
 
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे || १९ ||
 
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मियां गुरूकृपा नमिले | आदिबीज || २० ||
 
आतां अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थकला कामिनी |
ते शारदा विश्वमोहिनी | नमिली मियां || २१ ||
 
मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी || २२ ||
 
जैसे डोळ्यां अंजन भेटे | मग दृष्टीसी फांटा फुटे |
मग वास पाहे तेथ प्रकटे | महानिधी || २३ ||
 
का चिंतामणी जालया हाती | सदा विजयवृत्ति मनोरथी |
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती | ज्ञानदेवो म्हणे || २४ ||
 
म्हणोन जाणतेनो गुरू भजिजे | तेणे कृतकार्य होईजे |
जैसे मूळसिंचने सहजे | शाखापल्लव संतोषती || २५ ||
 
का तीर्थे जिये भुवनी | तिये घडती समुद्रावगहनी |
ना तरी अमृतरसास्वादनीं | रस सकळ || २६ ||
 
तैसा पुढतपुढती तोची | मियां अभिवंदिला श्रीगुरूचि |
जे अभिलषित मनोरुची | पुरविता तो || २७ ||
 
आता अवधारा कथा गहन | जे सकळां कौतुका जन्मस्थान |
की अभिनव उद्यान | विवेकतरूचे || २८ ||
 
ना तरी सर्व सुखांची आदि | जे प्रमेयमहानिधी |
नाना नवरससुधाब्धि | परिपूर्ण हे || २९ ||
 
की परमधाम प्रकट | सर्व विद्यांचे मूळपीठ |
शास्त्रजाता वसिष्ठ | अशेषांचे || ३० ||
 
ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥
 
नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।
आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥
 
म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥
 
तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥
 
एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।
आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥
 
माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भले ॥ ३६॥
 
एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७॥
 
आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥ ३८॥
 
भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।
तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व ॥ ३९॥
 
कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।
तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥ ४०॥
 
ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।
तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥ ४१॥
 
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥ ४२॥
 
ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥ ४३॥
 
नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।
मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४॥
 
तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।
ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥ ४५॥
 
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।
पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥ ४६॥
 
म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।
येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
 
ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८॥
 
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९॥
 
आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५०॥
 
ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिले निरवधि । नवनीत हे ।। ५१॥
 
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके ।
पद आले परिपाकें । आमोदासी ॥ ५२॥
 
जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३॥
 
जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल ॥ ५४॥
 
जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥ ५५॥
 
जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे ।
तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥
 
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥
 
हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥
 
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९॥
 
का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६०॥
 
ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे ।
आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥
 
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥
 
हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥ ६३॥
 
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥
 
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥
 
परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें ।
ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६॥
 
हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७॥
 
का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८॥
 
आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता ॥ ६९॥
 
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥
 
तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें ।
तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥
 
हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥
 
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३॥
 
हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे ।
गगन मुठीं सुवावे । मशके केवीं ॥ ७४॥
 
परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥
 
येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ ७६॥
 
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥ ७७ ॥
 
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ ७८॥
 
जयातें कामधेनू माये । तयासी अप्राप्य काही आहे ।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे । ग्रंथी इये ॥ ७९॥
 
तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते ।
करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे ॥ ८०॥
 
आता देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१॥
 
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरोपितु ।
ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२॥
 
तंव श्रीगुरू म्हणती राहीं । हे तुज बोलावे न लगे कांही ।
आता ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥ ८३॥
 
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४॥
 
        धृतराष्ट्र उवाच |
       धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
       मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय || १||
 
तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ॥
म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥
 
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । झुंजाचेनि ॥ ८६॥
 
तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।
तें झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७॥
 
       संजय उवाच |
       दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
       आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् || २||
 
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचलले ।
जैसें महाप्रळयीं पसरले । कृतांतमुख ॥ ८८॥
 
तैसे तें घनदाट । उठावले एकवाट ।
जैसें उसळले कालकूट । धरीं कणव ॥ ८९॥
 
ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवाते पोखला ।
सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९०॥
 
तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर ।
अवगमले भयासुर । तिये काळीं ॥ ९१॥
 
तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिले कवणे माने ।
जैसें न गणिजे पंचाननें । गजवटांते ॥ ९२ ॥
 
     पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् |
     व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता || ३||
 
मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ॥ ९३॥
 
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते ।
हे रचिले आथि बुद्धिमंते । द्रुपद्कुमरें ॥ ९४॥
 
जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनी कुरुठा केला ।
तेणे हा पाखरिला । देखदेख ॥ ९५॥
 
        अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
        युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ॥ ४॥
 
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।
जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६॥
 
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि ॥ ९७॥
 
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
 
        धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजेश्च वीर्यवान ।
        पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ॥ ५॥
 
       युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
       सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ: ॥ ६॥
 
चेकितान धृष्टकेतु । काशिश्वरु विक्रांतु ।
उत्तमौज नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
 
हा कुंतिभोजु पाहे । एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखे ॥ १००॥
 
हा सुभद्रहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा ॥ १०१॥
 
आणिकही द्रौपदीकुमर । के सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे अपार । मीनले आथि ॥ १०२ ॥
 
        अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम ।
        नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥ ७॥
 
        भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय: ।
        अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च ॥ ८॥
 
आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक ।
ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥ १०३॥
 
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।
तुम्हीआदिकरूनि । मुख्य जे जे ॥ १०४॥
 
हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानू ।
रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ॥ १०५ ॥
 
या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे ।
हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ॥ १०६॥
 
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।
याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७॥
 
समितिंजयो सोमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती ॥
जयाचिया बळा मिती । धाताही नेणे ॥ १०८॥
 
       अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
       नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद: ॥ ९॥
 
जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।
हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ ।। १०९॥
 
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगी ।
परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती ॥ ११०॥
 
 
पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ॥ १११॥
 
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।
ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥ ११२॥
 
झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती ।
हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां ॥ ११३॥
 
ऐसें सर्वापरी पुरते । वीर दळी आमुतें ।
आतां काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४॥
 
         अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
         पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥
 
वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु ।
तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ॥ ११५॥
 
आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें ।
येणे पाडे थेंकुले । लोकत्रय ॥ ११६॥
 
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥
मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ॥ ११७॥
 
ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।
तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८॥
 
आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें ।
ओइचलेनि पाडे । दिसत असे ॥ ११९॥
 
वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे ॥ १२०॥
 
         अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
         भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥
 
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें ।
आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१॥
 
जिया जिया अक्षौहिणी । तिये तिये आरणी ।
वरगण कवणकवणी । महारथिया ॥ १२२॥
 
तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।
द्रोणाते म्हणिजे । तुम्हीं सकळ ॥ १२३॥
 
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।
येणें दळभारु आघवा । साचु आमुचा॥ १२४॥
 
       तस्य स‍नयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
       सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥
 
या राजाचिया बोला । सेनापति संतोषला।
मग तेणे केला । सिंहनादु ॥ १२५॥
 
तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्यांआंतु ।
प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६॥
 
तयाचि तुलगासवे । वीरवृत्तिचेनि थावें ।
दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७॥
 
ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें ।
जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ॥ १२८॥
 
घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।
क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९॥
 
तेणें महाघोषगजरें । दुमदुमताती गिरिकंदरें ।
तंव दलामाजि रणतुरें । आस्फारिलीं ॥१३०॥
 
        ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः ।
        सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥
 
उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखाते ।
महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
 
भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ ।
आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२॥
 
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती ।
जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३॥
 
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।
जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४॥
 
एकां उभयतांचे प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।
बिरुदांचे दादुले । हिंवताती ॥ १३५॥
 
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।
देव म्हणती प्रळयकाळु । ओढवला आजि ॥ १३६॥
 
ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।
तंव पांडवदळा आंतु । वर्तलें कायी ॥ १३७॥
 
हो कां निजसार विजयाचे । कीं ते भांडार महातेजाचे ।
जेथ गरुडाचिचे जावळिये । कांतले चार्‍ही ॥ १३८॥
 
        ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
        माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥
 
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवितसे तैसा ।
तेजें कोंदटलिया दिशा जयाचेनि ॥१३९॥
 
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण ।
तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४०॥
 
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु ।
सारथी शारङधरु । अर्जुनेसीं ॥ १४१॥
 
देखा नवल तया प्रभूचें । प्रेम अद्भुत भक्तांचे ।
जे सारथ्य पार्थाचें । करीतु असे ॥ १४२॥
 
पाईकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला ।
तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ।। १४३॥
 
        पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः ।
        पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥
 
परी तो महाघोषु थोरु । गाजत असे गंहिरु ।
जैसा उदैला लोपि दिनकरु । नक्षत्रांते ॥ १४४॥
 
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळी गाजत होते ।
ते हारपोनि नेणों केऊते । गेले तेथ ॥ १४५॥
 
तैसाचि देखे येरें । निनादें अति गंहिरे ।
देवदत्त धनुर्धरे । आस्फुरिला ॥ १४६॥
 
ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट ।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७॥
 
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।
तेणें पौंड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८॥
 
         अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः ।
         नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ ॥ १६॥
 
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु ।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९॥
 
नकुळें सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु ।
जेणें नादें अतंकु । गजबजला असे ॥ १५०॥
 
        काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः ।
        दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥
 
        द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते ।
        सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥
 
तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।
हा काशीपती देख । महाबाहु ॥ १५१॥
 
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।
दृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२॥
 
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।
तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३॥
 
तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचिते ।
गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४॥
 
तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित ।
समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५॥
 
         स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
         नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥
 
पृथ्वीतळ उलथों पाहत । आकाश असे आसुडत ।
तेथ सडा होत । नक्षत्रांचा ।। १५६॥
 
सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली ।
ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं । १५७ ॥
 
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।
तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ॥ १५८॥
 
तंव आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।
मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९॥
 
म्हणोनि विश्व सांवरले । एर्‍हवीं युगांत होतें वोडवले ।
जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६०॥
 
तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला ॥
तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१॥
 
तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।
तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२॥
 
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ॥ १६३॥
 
         अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः ।
         प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ॥ २०॥
 
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते ।
तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४॥
 
मग सरिसपणें उठावले । दुणावटोनि उचलले ।
तया दंडी क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५॥
 
तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।
जैसे प्रलयांत जलधर । अनिवार का ॥ १६६॥
 
तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मने ।
मग संभ्रमे दिठी सेने । घालितसे ॥ १६७॥
 
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।
मग लीला धनुष्य उचलिले । पंडुकुमरें ॥ १६८॥
 
          हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
          अर्जुन उवाच - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१।
 
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।
नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९॥
 
         यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
         कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥
 
         योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः ।
         धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः ॥ २३॥
 
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।
न्याहळीन अशेख । झुंजते जे ॥ १७०॥
 
एथ आले असती आघवे । परी कवणेंसी म्यां झुंजावे ।
हे रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ॥ १७१॥
 
बहुतकरुनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।
वाटिवांवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२॥
 
झुंजाची आवडी धरती । परी संग्रामी वीर नव्हती ।
हे सांगेन रायाप्रती । काय संजयो म्हणे । १७३॥
 
                संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
                सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥
 
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला ।
दोहीं सैन्यामाजि केला । उभा तेणें ॥ १७४॥
 
 
        भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
        उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति ॥ २५॥
 
        तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
        आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता ॥ २६॥
 
        श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
        तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ २७॥
 
जेथ भीष्माद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।
पृथिविपति आणिक । बहुत आहाति ॥ १७५॥
 
तेथ स्थिर करूनि रथु । अर्जुन असे पाहतु ।
तो दळभार समस्तु । संभ्रमेसी ॥ १७६॥
 
मग देवा म्हणे देख देख । हे गोत्रगुरु अशेख ।
तंव कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ॥ १७७॥
 
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायि कवण जाणे ।
हें मनीं धरिले येणें । परि कांही आश्चर्य असे ॥ १७८॥
 
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थु ।
परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९॥
 
तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ ।
गुरू बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८०॥
 
इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले ।
हे सकळ असती आले । तयांमाजि ॥ १८१॥
 
सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोईरे ।
कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२॥
 
जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले ।
हे असो वडील धाकुले - । आदिकरुनि ॥ १८३॥
 
ऐसे गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।
हें अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४॥
 
        कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत ।
 
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।
तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
 
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।
तिया आणिकींते न साहति । सुतेजपणें ॥ १८६॥
 
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।
मग पाडेंविण अनुसरें । भ्रमला जैसा ॥ १८७॥
 
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।
मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना॥ १८८॥
 
तैसें अर्जुना तेथ जाहले । असतें पुरुषत्व गेले ।
जें अंतःकरण दिधले । कारुण्यासी ॥ १८९॥
 
देखा मंत्रज्ञु बरळु जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये ।
तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९०॥
 
म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला ।
जैसा चंद्रकळीं सिंपिला । सोमकांतु ॥ १९१॥
 
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।
मग सखेद असे बोलतु । अच्युतेसी ॥ १९२॥
 
        दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम् ।।२८॥
 
        सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
        वेपथुश्च शरीरे मे रोमाहर्षश्च जायते ॥ २९॥
 
        गांडीवम् स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते ।
        न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥
 
तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।
तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३॥
 
हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त ।
पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४॥
 
येणें नांवेंचिं नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धी ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
 
देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।
विकळता उपजत । गात्रांसी ॥ १९६ ॥
 
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळे हातु गेला । गांडीवाचा ॥ १९७ ॥
 
तें न धरताचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिले ।
ऐसे हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
 
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।
तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
 
जेणे संग्रामी हरू जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजि ॥ २०० ॥
 
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।
परि कळिकेमाजीं सापडें । कोवळियें ॥ २०१ ॥
 
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परीं ते कमळदळु चिरूं नेणे ।
तैसे कठीण कोवळेंपणे । स्नेह देखा ॥ २०२ ॥

हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया ।
म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
 
अवधारीं मग तो अर्जुनु ।देखोनि सकळ स्वजनु ।
विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
 
कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता ।
मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥ २०५ ॥
 
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।
जे वधावे हे सकळ । येणें नांवे ॥ २०६ ॥
 
         निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
         न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥
 
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे ।
हे येर येर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
 
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
 
देवा बहुतं परीं पाहता । एथ वोखटें होईल झुंजतां ।
वर काहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥
 
         न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च ।
         किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥
 
         येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
         ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥
 
तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं ।
एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥ २१० ॥
 
यां सकळांते वधावे । मग जे भोग भोगावे ।
ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
 
तेणें सुखेविण होईल । तै भलतेही साहिजेल ।
वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
 
परीं यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे ।
हे स्वप्नींही मन माझे । करूं न शके ॥ २१३ ॥
 
तरी आम्ही का जन्मावें । कवणालागीं जियावें ।
जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
 
पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।
जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले ॥ २१५ ॥
 
हें मनींचि केवि धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे ।
वरी घडे तरी कीजे । भले एयां ॥ २१६ ॥
 
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।
हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥ २१७ ॥
 
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।
मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
 
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।
जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
 
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें ।
शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
 
ऐसियांते कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं ।
निज हृदया करूं । घातु केवीं ॥ २२१ ॥
 
          आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः ।
          मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥
 
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
 
एथ शालक सासरे मातुळ । आणी बंधु कीं हें सकळ ।
पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
 
अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि ॥ २२४ ॥
 
         एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन ।
         अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥
 
हे वरी भलतें करितु । आंताचि एथें मारितु ।
परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
 
त्रैलोक्यींचे अनकळित । जरी राज्य होईल एथ ।
तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
 
जरी आज एथ ऐसें कीजे । तरी कवणांचा मनीं उरिजे ।
सांग मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा ॥ २२७ ॥
 
          निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
          पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥
 
जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊन दोषांचा ।
मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
 
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।
तयें वेळी तूं कवण कें । देखावासी ॥ २२९ ॥
 
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु ।
मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥ २३० ॥
 
सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।
न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥
 
तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा ।
जरी पुण्याचा वोलावा । नाशिजेल ॥ २३२ ॥
 
          तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान्स्वबांधवान् ।
          स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥
 
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।
हें किडाळ बहुतीं । परीं दिसतसे ॥ २३३ ॥
 
तुझा अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल ।
तेणें दुःखे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
 
म्हणावूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती ।
हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
 
          यद्यप्यते न पश्यंति लोभोपहृतचेतसः ।
          कुलक्षयकृतंदोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥
 
          कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
          कुलक्षयकृतम् दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥
 
हे अभिमानपदे भुलले । जरी पां संग्रामा आले ।
तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
 
हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे ।
जाणत जाणतांचि सेवावें । कालकूट ॥ २३७ ॥
 
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां ।
तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥
 
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।
तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ॥ २३९ ॥
 
का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।
तरी क्षणा एका कवळूनि । जांळू सके ॥ २४०॥
 
तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात ।
हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ॥ २४१ ॥
 
ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।
या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥
 
           कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनः ।
           धर्मे नष्टे कुलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥
 
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । येथ वन्हि एक उपजे ।
तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
 
तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।
तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४॥
 
म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।
मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजि ॥ २४५ ॥
 
             अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः ।
             स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥ ४१ ॥
 
एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें ।
आणि विधिनिषेध अघवे । पारुषति ॥ २४६ ॥
 
असता दीपु दवडीजे । मग अंधकारीं राहाटिजे ।
जे उजूंचि का आडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
 
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्य धर्मु जाय ।
मग आन कांहीं आहे । पापांवाचुनि ॥ २४८ ॥
 
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती ।
म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
 
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
 
जैसी चोहटाचिया बळी । पाविजे सैरा काऊळीं ।
तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ॥ २५१ ॥
 
           संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
           पतंति पितरि ह्येषां लुप्तपिंडिदकक्रियाः ॥ ४१॥
 
मग कुळा देखा अशेखा । आंणि कुळघातका ।
येरयेरा नरक । जाणें आथी ॥ २५२ ॥
 
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।
मग मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
 
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ॥ २५४ ॥
 
तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं बसती ।
म्हणोनि तेही येती । कुळापासी ॥ २५५ ॥
 
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।
तेवी आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥
 
          दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।
          उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः ॥ ४३ ॥
 
          उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
          नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
 
          अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं ।
          यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥
 
देवा अवधारी आणिक एक । एथ घडे महापातक ।
जै संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
 
जैसा घरीं आपुला । वानिवसे वन्ही लागला।
तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली ॥ २५८ ॥
 
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।
तेही बाधु पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
 
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।
मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
 
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही ।
येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
 
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे ।
हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥ २६२ ॥
 
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।
ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥ २६३ ॥
 
हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।
सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥ २६४ ॥
 
 
     यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः ।
     धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥
 
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवे ।
जे शस्त्र सांडूनि साहावे । बाण त्यांचे ॥ २६५ ॥
 
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।
परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
 
ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
 
     संजय उवाचः
     एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत् ।
     विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥
 
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं ।
संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
 
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला ।
तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
 
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु ।
कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
 
ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे ।
मग आकळुनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
 
तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।
दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
 
मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।
ऐसें ऐके राया तेथ वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
 
आता यावरी तो वैकुंठ्नाथु । देखोनि सखेद पार्थु ।
कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥ २७४ ॥
 
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।
ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
 
प्रथम अध्याय समाप्त ||

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती