मराठी संस्कृती टिकवण्यासाठी भाषाही टिकवायला हवी असे वाटते. दुसर्या राज्यात रहात असताना मराठी विषय म्हणून शिकवायची त्याची व्यवस्था व्हायला हवी. अन्यथा आपण मराठी आहोत, आपली मातृभाषा मराठी आहे, हेच तो विसरून जाईल.
मुंबईत मराठी टिकविण्यासाठी होणारी आंदोलने पाहून मन व्यथित होते. लोक नोकरीसाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे मुंबईत होणार्या आंदोलनांचा महाराष्ट्राबाहेर रहाणार्या मराठी लोकांवर काय परिणाम होईल, याचाही विचार केला पाहिजे. आम्हाला उद्या गुजरातमधून बाहेर काढले तर महाराष्ट्रात स्थान मिळेल काय? महाराष्ट्रानंतर गुजरात असे राज्य आहे, जेथे मराठी लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाषा टिकविणे हे आपल्या हाती आहे, दुसर्यांना मारझोड करून, हाकलून काढत भाषा नाही टिकवता येत.