राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी

गुरूवार, 24 जून 2021 (09:49 IST)
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मात्र, करोनामुळे अद्यापही रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, राज्यात बुधवारी ११ हजार ३२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १० हजार ६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १६३ करोनाबाधित रूग्णांचा  राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ५७,५३,२९० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,९७,५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती