राज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी

गुरूवार, 30 एप्रिल 2020 (10:10 IST)
राज्यात आज ५९७ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ९९१५ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात आज कोरोना बाधित ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. आज २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.
 
आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती