चिंताजनक! कोरोनातच आता म्युकरमाक्रोसिस आजाराला सुरुवात

मंगळवार, 4 मे 2021 (08:20 IST)
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नाकातील बुरशीजन्य (फंगसच्या) या नवीन आजाराने डोके वर काढले असून हा आजार झाल्यानंतर त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. उपचार वेळेत न घेतल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना करोना झालेला आहे व मधुमेह देखील आहे अशा रूग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन इंदोरवाला इनटी इन्स्टिट्युटचे प्रसिध्द कान-नाक -घसा तज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी केले.
 
डॉ. इंदोरवाला म्हणाले की, सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे त्यातच या म्युकरमाक्रोसिसच्या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा आजार नव्हता, मात्र दुसर्‍या लाटेत मधुमेही कोविड रूग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा आजार संसर्गजन्य आजार नसून मात्र वेळीच त्याचे निदान होऊन त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रूग्ण कायमस्वरूपी बरा होऊ शकतो अथवा रूग्णांच्या जीवावरही बेतू शकतो, असेही डॉ. इंदोरवाला म्हणाले.
 
या आजाराच्या लक्षणांबाबत डॉ. इंदोरवाला म्हणाले की, कोरोना रूग्णाच्या चेहर्‍यावर डोळ्याला सुज येणे, दिसायला बंद होणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायाला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी जवळच्या कान-नाक-घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रूग्ण दगावण्याची शक्यता असते. कारण करोनाच्या आजारात जर १०० पैकी ५ टक्के रूग्णांमध्ये लक्षणे अधिक दिसून लोक दगावू शकतात. मात्र म्युकरमाक्रोसिस या आजारात शंभर पैकी शंभर लोकांना जर वेळेत उपचार मिळाले नाही तर आजार अधिक बळावू शकतो. अथवा रूग्णही दगावू शकतो, असे डॉ. इंदोरवाला यांनी स्पष्ट केले.
 
म्युकरमाक्रोसिस हा आजार ओळखायचा झाल्यास त्याचे मुख्य लक्षण म्हणजे नाकात बुरशीसारखा रक्तमिश्रीत चिकट श्राव येतो, हा त्रास डोळे व मेंदू पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून बुरशीजन्य भाग काढणे गरजेचे आहे.
 
या आजाराची लक्षणे दिसताच रूग्णांना आठ दिवस भरती करून ‘लापोजोमल एमफोटेरसिन बी’ या इंजेक्शनचे ९० ते १०० डोस घेणे गरजेचे आहे. परंतु ज्या रूग्णाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा रूग्णांना ‘लापोजोमेल एमफोटेरसिन बी’ हे इंजेक्शन देऊनही आम्ही उपचार देतो. हे इंजेक्शन कमी दरात मिळते. त्यामुळे हा इंजेक्शनचा डोस घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे या आजाराची पुनरावृत्ती होत नाही. अन्यथा शस्त्रक्रिया करून ही बुरशी काढणे गरजेचे आहे. अन्यथा रूग्ण दगावू शकतो.
 
या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी, उत्तम आहार घ्यावा, मधुमेह नियंत्रणात असावा आणि नियमित व्यायाम करावा, घाबरू नये असे आवाहन डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. अबुझर इंदोरवाला, डॉ. गौरी महाजन व इंदोरवाला हॉस्पीटलचे सीईओ युसूफ पंजाब यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती