यशेंद्र क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे प्रकाशन

शुक्रवार, 12 मे 2017 (11:11 IST)
येथील कवितासागर प्रकाशनने नेहमीच उत्कृष्ट पुस्तकांची भेट वाचकांना दिली आहे. अनेक लेखकांच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम या प्रकाशनाचे सर्वेसर्वा डॉ. सुनील दादा पाटील अव्याहतपणे करीत असतात. त्यांच्या या कार्यातील पुढचे आणि महत्वाचे पाऊल म्हणजे कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे कवितासागर प्रकाशनाच्या मार्फत रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. 
 
सध्याचा भारतातील दीर्घकवितेचा विक्रम हा २६६२ ओळी आणि १०६७० शब्दांचा असून सदर दीर्घकविता आसामी भाषेतील आहे. कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी तब्बल ३०६९ ओळींची आणि १३,३६३ शब्दांची ही दीर्घकविता ‘भारतीय संस्कृती’ या विषयाच्या भोवती मोठ्या सामर्थ्याने व ताकदीनिशी गुंफली आहे. मराठी भाषेतील भारतीय संस्कृती या विषयावरील ही सर्वात मोठी कविता ठरत असून या दीर्घकवितेच्या रूपाने सर्वात मोठ्या दीर्घकवितेचा सद्य विक्रम मोडून तो मराठी भाषेच्या नावे नोंद होत आहे. ही दीर्घकविता लिमका बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस अशा भारतातील विविध विक्रमांची नोंद ठेवणा-या नामांकित संस्थांकडे विक्रमांसाठी आपली सशक्त दावेदारी लवकरच पेश करणार आहे. 
 
या उपक्रमात कवितासागर प्रकाशनाचे डॉ. सुनील दादा पाटील यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. सदर दीर्घकवितेस डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. सदर प्रकाशन समारंभास प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य, कवी विश्वास पारिसा बालीघाटे, प्राचार्य बी. बी. गुरव, कवी विष्णू रामू वासुदेव, उद्योगपती संजय आप्पासो सुतार, राज धुदाट, कवी विजयकुमार आण्णासो बेळंके, विलासराव शंकरराव डोईजड, हरी निवृत्ती जगताप, माणिक नागावे, लेखिका विजया प्रकाश पाटील, कवी डी. बी. चिपरगे, सौ. रोझमेरी राज धुदाट इत्यादी उपस्थित राहणार आहेत.  

वेबदुनिया वर वाचा