मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जॉली एलएलबी-2 या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील अवमानकारक शब्द वगळावे आणि जाहिर माफी मागावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.
अॅड. अजयकुमार वाघमारे यांच्या वतीने अॅड. पंडीतराव आनेराव यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमुर्तींच्या आसनासमोर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर मारामारी आणि बिभत्स नृत्यही करतात.
चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असे लिहून निर्माता व दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकीली व्यावसायाची चेष्टा केली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. याचिकेवर 24 जानेवारी 2017 रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे.