अमिताभ सेल्फी काढणार्‍यांवर भडकले

सोमवार, 6 जुलै 2015 (10:06 IST)
सेल्फीचे आजकाल व्यसनच जडले आहे. मात्र अशाच काही सेल्फी चाहत्यांवर महानायक अमिताभ बच्चन चांगलेच भडकले. दिल्लीमध्ये एका जवळच्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी अमिताभ उपस्थित राहिले असताना त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याची मागणी करणार्‍या चाहत्यांना अमिताभ यांनी चांगलेच फैलावर घेतले. एवढंच नाही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना लोकांमधील संवेदना संपत चालल्याचे खडे बोलही अमिताभ यांनी सेल्फीवेड्यांना सुनावलेत.
 
‘माझ्या जवळच्या मित्राचे अचानक निधन झाले. काल-परवापर्यंत आम्ही बोलत होतो आणि अचानक तो हे जग सोडून गेला. जीवन किती नाजूक आहे ते या घटनेने कळले. अर्थात दिल्लीला मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो. तिथे अंत्यविधी सुरू असतानाच लोक मोबाइलवरून फोटो आणि सेल्फी क्लिक करत होते. हे खूपच धक्कादायक होते. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या काहीच संवेदना दिसत नव्हत्या. श्रद्धांजली देण्यासाठी आलेल्या आप्तांना शोकही त्यांना दिसू नये, हे दुर्दैवी आहे’, असा संतापच अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा