मुंबई : या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची?

गुरूवार, 10 जून 2021 (11:04 IST)
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक इमारत बुधवारी (9 जून) रात्री कोसळली आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मुंबई महापालिकेनच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आलंय की, मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 17 व्यक्ती जखमी झाले असून 11 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत.
 
मृतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश
बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मालाडमधल्या मालवणी गेट क्रमांक 8 येथे ही घटना घडली आहे.
 
या भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 7 बालकांचा समावेश आहे. इतर 7 जखमी आहेत.
 
मृतांची नावे पुढीलप्रमाणे-
 
साहिल सर्फराज सैय्यद (9)
अरिफा शेख (8)
अनामिक (40)
अनामिक (15)
अनामिक (8)
अनामिक (3)
अनामिक (5)
अनामिक (30)
अनामिक (50)
अनामिक (8)
जॉन इर्रान्ना (13)
 
दरम्यान, या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
 
'या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची?'
या घटनेविषयी भाजप नेते राम कदम यांनी म्हटलंय, "मालाड मालवणी मधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित मुंबई महापालिकेकडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेत अनधिकृत उंची रोखली असती, वसुलीचे धंदे थांबवले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते. सवाल आहे शिवसेना आणी मुंबई महापालिका या हत्येची जबाबदारी घेणार का?"
 
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, की मालाड येथे इमारत कोसळून,त्यात जीवित हानी झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
 
"अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, याची मुंबई महापालिका प्रशासनानं काळजी घ्यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा धोकादायक इमारतींवर वेळेत योग्य कारवाई होणे अपेक्षित होते," असं दरेकर यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती