सातपुड्यात ‘जलसंकट’ ओढावले : पाण्याची पातळी खालावली

मंगळवार, 19 मार्च 2024 (09:12 IST)
धानोरा, ता. चोपडा : धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. संपूर्ण सातपुडा पर्वतावरील शेती शिवार आणि गावांवर ‘जलसंकट’ ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. धानोरा परिसर तसा शेती, समुध्दीने नटलेला आहे. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे विहिरी या टप्पा करीत असून संपूर्ण परिसरात ‘जलसंकट’ आल्याचे नजरेस पडत आहे. शेतकरी पिके वाचविण्यासाठी अहोरात्र धडपड करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हांचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. त्याची झळ शेती शिवारातील पिकांनाही तेवढ्याच उष्णतेने जाणवत आहे तर शेतातील विहिरींची पातळीही खोल जात असल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसत आहे.
 
धानोरा परिसरातील देवगाव, पारगाव, बिडगाव, मोहरद, कुंड्यापाणी, चांदण्या तलाव, वरगव्हाण या शेती शिवाराला फायदेशिर ठरणारे धरण आहेत. मात्र, त्यांच्यात अल्प पाणीसाठा असल्याने तसेच धरणांची उर्वरित कामे अपूर्ण राहिल्याने त्यांचा काही एक उपयोग झालेला नसल्याचे नजरेस पडत आहे. परिसराला वरदान ठरणारे चिंचपाणी धरणाचे काम आजही अपूर्णावस्थेत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच धरणाची राजकीय पुढाऱ्यांना आठवण होते. तेही असे ‘स्वप्न अपुरे चिंचपाणी धरणाचे, आम्ही पूर्ण करू तयाचे’ एवढीच गोष्ट त्यांना आठवते. तेवढ्यापुरता धरणाची कामे केली जातात.
 
धानोरा परिसराला भविष्याच्या दुष्टीने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चिंचपाणी धरण वगळता कोणतेही धरण नाही. त्यामुळे चिंचपाणी धरणाचे उर्वरित राहिलेले काम होणे अत्यावश्‍यक आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाने चाळीशीच्यावर मजल मारली आहे. अद्याप ‘मे हिटचा’ तडाखा बाकी आहे. चोपडा, यावल, रावेर हे तालुके केळीसाठी प्रसिध्द आहे. केळी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड या भागात केली जाते. याच महिन्यात केळी बागा उन्हामुळे करपु लागल्या आहे. केळीचे घड काळी पडत आहेत तर शेतकरी मिळेल त्या साधनाने त्यावर आच्छादन घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती