किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:47 IST)
जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
 
मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती