गणपतीपुळे: समुद्रात बुडून तिघांचा मृत्यु

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (16:18 IST)
रत्नागिरी: पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध सुरू आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. कोल्हापूर (कसबा बावडा) येथून गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी एक कुटुंब आलं होतं. आज सकाळी समुद्रकिनार्‍यावर आल्यावर त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही आणि चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. आणि बुडणार्‍या या पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका मुलीला वाचविण्यात यश आलं. सुरक्षारक्षक गुरुप्रसाद बलकटे यांनी समुद्रात रिंग टाकून या मुलीला वाचविलं. तर तिघे मात्र बुडाले. या तिघांपैकी काजल जयसिंग मचले (18) आणि सुमन विशाल मचले (23) या दोघींचे मृतदेह सापडले आहेत. तर राहुल अशोक बागडे हे बेपत्ता होते. त्यांचा शोध असताना दुपारी त्यांचाही मृतदेह सापडला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच आज सकाळी कसबा बावडा येथून दोन वाहनातून मचले यांचे नातेवाईक व मित्र परिवार गणपतीपुळ्याकडे रवाना झाले होते.
 
दरम्यान, सुरक्षा रक्षक वेळीच धावून आल्याने चार जणांचे प्राण वाचले. बुडालेले तिघेही कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राहतात आहेत. हे तिघेही मुळचे कर्नाटकातील असून कामानिमित्त कोल्हापुरात असल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती