Weather Alert पाऊस का पडू शकतो?

मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (15:29 IST)
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. आता वितळणारा बर्फ आणि थंड उत्तरेकडील वाऱ्यांमुळे काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. परंतु 22-23 डिसेंबरपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे ढगांच्या आच्छादनासह तापमानात बदल होण्याची शक्यता आहे. 3 दिवसांनंतर हवामानातील बदलामुळे अनेक शहरांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील बहुतांश शहरांमध्ये दाट धुके असेल.
 
परिणामस्वरुप महाराष्ट्राच्या दिशेनं येणाऱ्या शीतलरहींचा परिणाम राज्यातील तापमानावर होत आहे. निफाडमध्ये थंडी वाढली असून 11.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर पुढच्या 2 दिवसांत निफाडसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 
 
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमान 14 अंशांवर पोहोचेल अशा अंदाज व्यक्त केला जात आहे तर उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. मात्र दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात तूर्तास किमान तापमानात कोणतीही घट होण्याची चिन्हे नाही.
 
डिसेंबरच्या मध्यापासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे. आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे.
 
IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत.
 
पाऊस का पडू शकतो?
 
 
दुसरीकडे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात.
 
 
या वर्षी अल निनोचा प्रभाव अधिक आहे, यामुळे महाराष्ट्रात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती